राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारपरिषदेतून दिली. ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक  नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरू होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देखील काही गाइडलाइन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास करोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.

यावेळी उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असायला हवी. यूजीसीने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालयं सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होतील.

महाविद्यालयं सुरू होत असताना यूजीसीने देखील काही गाइडलाइन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे, संबंधित जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणांना पायाभूत सुविधांची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. करोना संसर्गाच्या प्रमाणाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे व त्यानंतर विद्यापीठांनी आपली महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ही विद्यापीठं महाविद्यालयं १५ फेब्रवारीपासून सुरू करू शकतात, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यता आला आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन व ऑफलाईन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीच्या पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी चर्चा कुलगुरुंच्या बैठकीत झाली. याबाबत देखील विद्यापीठांना निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, शिक्षणमंत्रालय व यूजीसी यांचा सल्ला घेऊन भविष्यातील कोविड संदर्भातील परिस्थितीवर निर्णय कसे घ्यायचे, हे ठरवावे असे देखील सांगण्यात आले आहे.

प्रवेश, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम पूर्ण करणं, परीक्षा, मूल्यमापन, निकाल जाहीर करणं याबाबत जी विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता वाटते. त्या संदर्भात देखील विद्यापीठांनी तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील शंका दूर कराव्यात. असं यूजीसीचं म्हणणं असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.

महाविद्यालयांबाबत लवकरच निर्णय

करोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मागील दोन-तीन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर २०२० पासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर, महाविद्यालये व शिक्षणसंस्था सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी असल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.