६०० उद्योगांना उत्पादन थांबवावे लागण्याची भीती

पालघर/ बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून (सी.ई.टी.पी) सांडपाण्यावर अपेक्षित प्रक्रिया होत नसल्याने २५ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्यामुळे या औद्य्ोगिक वसाहतींमधील रासायनिक, वस्रोद्योग, औषधनिर्मिती, इस्पात यांच्यासह रासायनिक सांडपाणी निर्माण करणाऱ्या सुमारे ६०० उद्योगांना आपले उत्पादन थांबवावे लागणार आहे.

२००८ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या सांडपाणी प्रक्रिाया केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा अधिक रासायनिक सांडपाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून अनेकदा ओव्हरफ्लो होऊन प्रदूषित सांडपाणी जवळपासच्या नाल्यामार्गे नवापूर खाडीमध्ये मिसळत असे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या आदेशात म्हटले आहे.

या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रियेअंती बाहेर निघणाऱ्या सांडपाण्यातील ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ (सीओडी) हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा काहीपटीने अधिक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये आढळून आले. याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर या प्रकल्पातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया करण्याबाबत कोणत्याही ठोस उपाय योजना (अ‍ॅक्शन प्लॅन) आखला गेला नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे.

‘तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन’ सोसायटीकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या नव्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील २५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सशर्त परवानगी दिली असून, हा प्रकल्प सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी आहे.

त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून बाहेर सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर देखरेख ठेवण्यात संबंधित संस्था अपयशी ठरल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे.

या सामुदायिक सांडपाणी प्रक्रियाकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या मर्यादेच्या अनुषंगाने प्रक्रिया होत नसल्याने हा प्रकल्प तातडीने बंद करण्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ६ मार्च रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याची माहिती संबंधित ११७० सदस्यांना देऊन या सर्व उद्योगांकडून या प्रकल्पाकडे कोणत्याही प्रकारचे सांडपाणी पाठविण्यात येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. परिणामी सांडपाणी निर्माण करणाऱ्या ६००हून अधिक उद्योगांना तातडीने आपले उत्पादन बंद करावे लागणार असून, त्याचा फटका दीड ते दोन लाख कामगारांना बसण्याची शक्यता आहे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या २५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची चाचणी सुरू असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली कारवाई अनपेक्षित आहे. त्यामुळे उद्योगांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असून, त्याचा परिणाम दीड -दोन लाख रोजगारावर होणार आहे.

– डी. के. राऊत, अध्यक्ष ‘टी.मा’