“कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांनी ट्वीटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना येथे लक्ष्य केले. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा आशयाचं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

आणखी वाचा – इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – आव्हाड

काय म्हणाले होते आव्हाड ?
आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल,” असेही आव्हाड म्हणाले.

परंतु नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते. पण आणिबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात. पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही, इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. तं पासही पोहचू शकत नाहीत, असं आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं.