करोनामुळे देशभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे असंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्राच्या लस उत्पादन निर्णयांबाबत मी अनभिज्ञ!

नितीन गडकरी यांनी लसनिर्मितीसाठी दिलेल्या सल्ल्यावर बोलताना ते म्हणाले की, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”.

“नितीन गडकरी काय सांगत आहेत, हे नरेंद्र मोदी ऐकतायत का?”

लोकसभा निवडणूक घेण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, “भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल,” असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

अन्यथा राज्यभर घंटानाद आंदोलन
‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

“करोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. १०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे तर डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी ११८५ रुपये होती ती आता १९०० रुपये केली आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ रुपयांऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.