रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. याच पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काल एकाच दिवशी ८३८१ रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक ११६. रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा अशी विनंती”.

आणखी वाचा- करोनाच्या लढ्यावर लक्ष केंद्रीत करा, आकडेवारीवर नाही – देवेंद्र फडणवीस

राजेश टोपे यांनी शुक्रवारी २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिली होती. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. व्हेंटिलेटर अवघ्या दीड टक्के लोकांना लागतो आहे असं सांगितलं होतं. आजची संख्या मी जाणीवपूर्वक अधोरेखित जोडतो आहे. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.