मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ द्यावे
“केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असे सांगण्यात येते की मे महिन्यात या रोगाचा उच्चांक येईल. तो जून, जुलैमध्येही येऊ शकतो असंही बोललं जात आहे. वुहानमध्ये परत करोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असं मी वाचलं. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी,” अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

पिक कर्ज मिळावे
“महाराष्ट्रात करोनापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

जीएसटी परतावा लवकर मिळावा
राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसंच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. “कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी, चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करण्यात आली,” असल्याचंही ते म्हणाले.

“या करोनाचा प्रतिबंध करणारे औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन ते तयार करण्यात पुढाकार घेतल्यास उपयोग होईल,” असंही त्यांनी सांगितलं. “वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावं. तसंच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत सीमा शुल्कात सवलत -द्यावी,” असंही ते म्हणाले. मुंबई-पुणे सारख्या तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील असे पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.