राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दरोरज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांबरोबरच, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील करोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.

राजेश टोपे म्हणाले, ”दररोज राज्यात ३ लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे.”

”गृहविलगीकरणात ज्यांना ठेवण्यात आलं आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतः देखील लक्ष द्यावं आणि अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याव लक्ष ठेवावं. आमचे आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर ठेवून आहेत, त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.” असं देखील टोपेंनी यावेळी सांगितलं.

”आता जिथे निवडणुका सुरू आहेत. त्या गुजरातमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत. तिथे गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होत नाही. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी. आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे.आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे. कोविशील्डच्या २ डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.” अशी माहिती टोपे यांनी दिली.

”मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी काल बोलणं झाले आहे. त्यांनी वाढती रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. जर करोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणण आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. पण जनतेला एकच आवाहन करतो की, लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत.” असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी जनतेला केलं आहे.