वसंत मुंडे | अहमदनगर येथील करोनाबाधित नातेवाईकाच्या संर्पकात आलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एकाला करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने जिल्हात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा एका संशयित रुग्णाचा तपासणी अहवाल आला असून अन्य एक जणाचा अहवाल प्रलंबित असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे. प्रशासनाने रुग्ण सापडलेल्या गावाचा तीन किलोमीटरचा परिसर आणि दहा गावे पूर्णपणे बंद केली आहेत. तर बाधित रुग्णाच्या संपर्कातील तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल 15 दिवस नंतर अखेर जिल्ह्याची तटबंदी तोडून करोनाने जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या काळजीत भर पडली आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करून जिल्ह्यात करोनाचा प्रवेश होणार नाही याची खबरदारी घेतली होती. प्रशासनाच्या अथक प्रयत्न चांगले यश आले होते. बहुतांश शेजारच्या जिल्ह्यांमध्ये लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर येथे करोनाचे रुग्ण सापडत असताना बीडमध्ये मात्र एकही रुग्ण नव्हता. मात्र अशा परिस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा आष्टी तालुक्यातील पिंपळगावातील एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयात धडकला आणि एकच खळबळ उडाली. पिंपळगावातील हा रुग्ण अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तर अन्य एकाचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ या बाधित रुग्णाच्या संपर्कातील तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर गावाचा तीन किलोमीटरचा परिसर बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर या परिसरातील दहा गावेही निगराणीखाली ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. यामध्ये सूंबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळसांगावी, खरडगव्हाण हा परिसर कोरंटाइन झोन म्हणून घोषित करण्यात आला. तर लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटेफळ, कोयाळा ही गावेही खबरदारीसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. या भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. अहमदनगरमधील जमातच्या कार्यक्रमासाठी हा बाधित रुग्ण जावयास भेटण्यासाठी गेला होता. मात्र त्याचा जावाई देखील बाधित असल्याने त्यांना करोनाची लागण झाली, असे सांगितले जात आहे. देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातही 22 मार्च पासून प्रतिबंधक उपाय सुरू करण्यात आले आहेत.