वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्यावर ३५ कोटींच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी मानहानीचा हा दावा दाखल केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे तसंच तथ्यहीन आरोप केल्याचा दावा अब्दुल रहमान अंजरिया यांनी केला आहे. लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणीही अब्दुल रहमान अंजरिया यांनी केली आहे. लक्ष्मण माने यांनी अब्दुल रहमान अंजरिया यांच्यावर आरोप केले होते. अंजरिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपामध्ये काम केल्याचं त्यांनी आरोपात म्हटलं होतं. अंजरिया यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावरदेखील लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतला होता. लक्ष्मण माने यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचा दावा अंजरिया यांच्याकडून करण्यात आला आहे. तसंच वकिलांच्या मार्फेत ३५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण माने यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. वंचित आघाडीत बिघाडी; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा लोकसभा निवडणुकीनंतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच लक्ष्मण माने यांनी केली होती. ‘प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली आहे,’ अशा शब्दांत लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत टीका केली होती. तर या टिकेला उत्तर देताना पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे.