भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आलेल्या अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार पडेल असं म्हणत आहेत. गाजर दाखवण्याचं काम सुरु आहे तरीही एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपा नेत्यांचा समाचार घेतला. भाजपामधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असे अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.

महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे एकमेव धोरण आहे. आजवर महाराष्ट्र कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केलं. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करण्याची आवश्यकता नाही. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.