इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावरुन वाद आहे. माझाही पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. मात्र इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळयाचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्र बंदची हाक झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात २४ तारखेला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये ३५ संघटना सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसते देशाची आजची परस्थिती अराजकता माजेल अशी झाली आहे. या परिस्थितीला भाजप आणि आरएसएस हे जबाबदार आहेत. कारण देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसत आहे.धमकावणे, दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.