प्रशांत देशमुख विविध मिथकांना तिलांजली देण्याचे काम यावेळच्या लोकसभा निवडणुकीने केले असून प्रामुख्याने पूर्व विदर्भातील जातीय तेढ संपुष्टात आणण्याचे काम खासदार रामदास तडस यांच्या विजयाने केल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. यावेळची लोकसभा निवडणूक काही विशिष्ट पार्श्वभूमीवर झाली. हा जिल्हा आधीपासून कुणबी-तेली वादाचा केंद्रबिंदू राहिला. प्रत्येक निवडणुकीकडे जातीय पैलूचे परिमाण लावून पाहिले गेले. मात्र, मतदारांनी उमेदवार किंवा पक्ष पाहूनच मतदान केले. हा अनुभव यावेळेस मोडीत निघण्याची चिन्हे होती. निवडणुकीच्या दोन महिन्यापूर्वी कुणबी-तेली वादाने नाहक उसळी घेतली होती. तेली समाजाच्या मेळाव्यात मेघेंना तिकीट मिळाल्यास मेघे पिता-पुत्राचे गावोगावी पुतळे जाळण्याची भाषा उच्चारली गेली. तडस यांचे तिकीट कापून ते सागर मेघेंना देण्याचा डाव असल्याच्या पार्श्वभूमीवर हा राग उसळला. वस्तुत: सागर मेघेंना तिकीट देण्याची बाब चर्चेपुरतीच होती. केवळ पक्षाच्या निवडणूक मंडळाकडे एका नावाऐवजी दोन नावे असावी म्हणून मेघे जोडले गेले. पण पुतळे जाळण्याच्या भाषेने कुणबी समाजाच्या काही मंडळांनी तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा केली. हा वाद तेली समाज असणाऱ्या नागपूर, भंडारा, चंद्रपूपर्यंत पोहोचला. तेली समाज मेळाव्याच्या भूमिकेला कुणबी समाज मेळाव्याद्वारे नागपुरातून प्रत्युत्तर दिले गेले. दोन्ही समाजाच्या नेत्यांची अशी टोकाची भूमिका भाजप व काँग्रेसच्या धुरिणांच्या तोंडचे पाणी पळवणारी ठरली. खरे तर विशिष्ट जात विशिष्ट पक्षाशी पूर्णपणे बांधिलकी ठेवते, हा निकषच चुकीचा म्हटला जातो. मतमोजणीत ते दिसूनही आले. मोदीलाटेत जातीय ध्रुवीकरण धुळीस मिळाले. पावणेदोन लाख मतांच्या फरकाने रामदास तडस पुन्हा निवडून आले. नेतृत्वाच्या करिष्म्यावर जात बाजूला पडली आणि पारंपरिक जातीय राजकारणाच्या चर्चेला यावेळी पूर्णविराम मिळाला. खासदार तडस यांना जातीय शिक्का लावून पाडण्याचे बेत उधळले गेले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तडस यांनी प्रभावी जनसंपर्क, समाजातील सर्व घटकांशी ठेवलेली आपुलकी, खासदार निधीतून पूर्णत्वास नेलेली कामे, केंद्रातून आणलेल्या काही योजना या बळावर निवडणुकीसाठी शिदोरी भक्कम केली होती. मोदींच्या प्रभावासोबतच व्यक्तिगत नेतृत्व गुणांवर तडस निवडून येण्याची खात्री भाजपजन देत होते. ते खरे ठरले. दुसरी बाब म्हणजे, या मतदारसंघात दरवेळी चेहरेपालट करण्याची परंपरा यावेळी मोडली. गेल्या आठ निवडणुकींपासून सातत्याने नवा चेहरा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिला. तसे करताना एकाच पक्षाच्या दोन वेगवेगळय़ा चेहऱ्यांना संधीही मिळाली. यावेळी तडस परत निवडून येण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर तपासली जात होती, पण मोदीलाटेत परंपरा खुंटली. काँग्रेसला धक्का विविध निवडणुकीत सातत्याने पराभूत होणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीने पुरते हताश केले आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चारुलता टोकस यांना विजयाची मोठी खात्री होती. जातीय राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व केंद्रसत्तेवरचा संताप म्हणून मतदार काँग्रेसला संधी देतील, अशी खात्री काँग्रेसच्या सहापैकी तीन आमदारांना होती, पण संघटन पातळीवर शून्यवत झालेल्या काँग्रेस नेत्यांना हवेचा रोख ओळखताच आला नाही. कार्यकर्ता नेता हा संवाद कधीचाच संपुष्टात आल्याचे गावीही नसणाऱ्या नेत्यांमध्ये परत रुसवाफुगवा होताच. मतदान केंद्रनिहाय पावत्या वाटपाच्या कामात गटबाजी आलीच. काहींना मतदानाच्या दोन तासापूर्वी या पावत्या मतदारांना वाटण्यासाठी देण्यात आल्या. त्या पोहोचल्याच नाहीत. पोखरलेल्या वाडय़ाचा श्रीमती टोकस यांना शेवटपर्यंत अंदाजच आला नाही. त्यामुळे निकालातून उमटलेले चित्र त्यांना कमालीचा धक्का देणारे ठरले. जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची भाजपनेत्यांची भाषा खरी ठरू लागत असल्याचे हे एक उदाहरण ठरावे.