कोल्हापूर येथे भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. मृतांमध्ये १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे सुत्रांकडून कळते. मिरज येथील हे प्रवासी असून आज (शनिवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जोतिबा फाटा येथे ही दुर्घटना घडली.

सुत्रांच्या माहितीनुसार, मिरज येथील दत्त कॉलनीमधील रहिवाशी असलेले तांदळे कुटुंबीय रत्नागिरी आणि मार्लेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मार्गावरील जोतिबा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या तवेरा कारचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यानंतर ही कार जवळच्या रेडे डोहात जाऊन कोसळली. या डोहात पाणी असल्याने कार पूर्णपणे पाण्यात बुडाली. या भीषण अपघातात कारमधील १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. तर २ मुले जखमी झाले आहेत, त्यांना उपचारांसाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अश्विनी सुनील तांदळे (वय २६), अनिषा सुनील तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), धनश्री शशिकांत माने (७), जान्हवी सुनील तांदळे ( वय ७, सर्व रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (वय ५), ओम सुनील तांदळे (वय ३) या बालकांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलराजे रुग्णालयात (सीपीआर) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहिम सुरु आहे.

तवेरा कारमधून, श्रेयश रावसाहेब आडमुठे (वय ४), संगिता रावसाहेब आडमुठे (३५), अविराज आनिल तांदळे (११), रोही शशिकांत माने (६), अलका शशिकांत माने (२७), जयश्री अनिल तांदळे (२९), आदर्श नितीन तांदळे (५), ओम सुनील तांदळे (१.५), पूनम सुनील तांदळे (२८), किरण सुभाष माने (१८), धनश्री शशिकांत माने (८), जान्हवी सुनील तांदळे (६), अश्विनी नितीन तांदळे (२५), अनिशा अनिल तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), ड्रायव्हर वैभव वसंत वाणकर (सर्व राहणार मालगांव रोड, दत्त कॉलनी, कवठेमहांकाळ, मिरज) हे लोक प्रवास करीत होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जीवन ज्योत संस्थेच्या जवानांनी, व्यवस्थापन प्रमुख प्रसाद सकपाळ, अग्निशामक दलाचे प्रमुख बांदेकर आणि सहकाऱ्यांसह बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.