पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे दु:ख

चंद्रपूर : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दुखावलेल्या पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून स्वत:ही गळफास घेतला. ही हृदय़द्रावक घटना बल्लारपूर शहरातील विवेकानंद वॉर्डात घडली. पतीने स्वत: आत्महत्या करण्यापूर्वी मुलींचा गळफास लावलेला फोटो पत्नीच्या व्हाट्सअ‍ॅपवर टाकला.  ऋषिकांत कडूपले (४०) असे पित्याचे तर नारायणी कडूपले (५) व कार्तिकी कडूपले (२) अशी मुलींचे नाव आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऋषिकांत हा आपल्या पत्नी व दोन मुलींसह बल्लारपूर शहरातील विवेकानंद वॉर्डात राहत होता. तो खाजगी आयटीआय मध्ये शिक्षक होता. पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती पती व दोन चिमुकल्या मुलींना सोडून आठ दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली. कुंटुंबीयांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. घरी येण्याची विनंती केली. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. या घटनेने ऋषिकांत खचला होता. त्याने १ एप्रिलच्या रात्री पाच वर्षीय नारायणी व दोन वर्षांची मुलगी कार्तिकी हिलाही गळफास लावला. दोन्ही मुलींना गळफास लावल्याचे फोटो पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप केले. तिने ही माहिती आपल्या वडिलांना दिली. परंतु तो पर्यंत सगळे संपले होते. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबीयांनी या घटनेला कारणीभूत पत्नीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी बल्लारपूर पोलिस ठाण्यात ठाण मांडला होता.