जायकवाडीला पाणी चालल्याने भंडारदरा व निळवंडे धरणांच्या लाभक्षेत्रातील सहा तालुक्यांत दिवाळीच्या गोड सणावर चिंतेचे सावट पडले आहे. एवढेच नव्हेतर प्रकाशाऐवजी अंधारात सण साजरा करावा लागतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे.जायकवाडीला पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून आज जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी संजीवकुमार दयाल यांची भेट घेऊन नदीकाठच्या भागात विजपुरवठा खंडित करण्याची मागणी केली. तुम्ही लेखी आदेशाची प्रत मला द्या, त्यानंतरच वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले जातील. पण सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित केला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे पोलिसांचे म्हणणे ऐकूण निर्णय करू, असे जिल्हाधिका-यांनी सांगून सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित ठेवण्यास नकार दिला. मुंबई येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्री व नेत्यांनी मुख्यमंत्री चव्हाण व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची भेट घेतली असता सणाच्या काळात नदीकाठचा वीजपुरवठा खंडित ठेवू नये अशी मागणी केली. त्यावर आज निर्णय झाला नाही तो उद्या होईल.यंदा जायकवाडीत ३३ टक्के पाणीसाठा झाल्याने पाणी जाणार नाही तसेच निळवंडे व भंडारद-यातून चार आवर्तने मिळतील. ऊसलागवड करता येईल असे नेते सांगत होते. त्यामुळे शेतकरीही खूश होते. दिवाळीचा आनंदाचा सण सुरू झाला असताना आज मात्र शेतक-यावर भविष्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. दिवाळीत राजकीय पक्ष व संघटना आंदोलने करीत नसतात, पण ही पहिलीच दिवाळी आंदोलनाने साजरी होत आहे.