पंढरपूर : चार मोठ्या वारी असे कि महिन्याची एकादशी.पंढरी नगरीत टाळ मृदुंगाचा जयघोष आणि भाविकांनी फुलून गेलेले असतो.मात्र शनिवारी चैत्र एकादशी दिवशी ना भाविकांची गर्दी ना टाळ मृदुंगाचा जयघोष कानी पडला. चंद्रभागा नदी,भक्त पुंडलिक हे ठिकाण तर ओस पडलेली दिसून आली. इतिहासात पहिल्यांदाच भाविकाविना पंढरीत चैत्री एकादशी पार पडली आहे. असे असले तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस १ लाख गुलाबाच्या फुलांची आरास केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. “ माझ्या जीवाची आवडे पंढरपुरा नेईन गुढी “ असे म्हणत शेकडो वर्षाची वारकरी परंपरा जोपासत लाखो वैष्णव पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात.वारकरी संप्रदायात आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्र वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच दर महिन्याची एकादशीला देखील भाविक पंढरीला दर्शनासाठी येतात.मात्र,सध्या करोनाचे संकट घोंघावत आहे.या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद केले. तर वारकरी पाईक संघ आणि महराज मंडळीनी चैत्र वारीसाठी राज्यातील भाविकांना पंढरीला येऊ नका असे आवाहन केले होते. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चैत्र वारी रद्द केल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर पंढरीत शनिवारी चैत्र एकादशीचे औपचारिकता पूर्ण झाली. येथील श्री विठ्ठलची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य आ.सुरजितसिंह ठाकूर यांनी तर रुक्मिणी मातेची पूजा सदस्य संभाजी शिंदे यांनी केली. या वेळी रामभाऊ जांभूरकर या भाविकाने जवळपास १ लाख गुलाबाच्या फुलांची आकर्षक आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे वर्षातील दोन एकादशीला विठ्ठलाला पुरण-पोळीचा नेवैद्य दाखविला जातो. कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेव याने पंढरीतील पांडुरंगाची मूर्ती नेली होती. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी हि मूर्ती परत आणली तो दिवस चैत्र एकादशी होता. त्यामुळे या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य दाखविण्याची परंपरा आहे. असे असले तरी आता भाविकांना ओढ लागली आहे ती देवाच्या दर्शनाची. उघड दार देवा आता उघड दार देवा अशी आर्त विनवणी सावल्या विठूरायाला करीत आहेत. अपूर्व त्याग ण विसरता येणारा :ह.भ.प. वीर महाराज श्री पंढरीक्षेत्रातील वारकरी संप्रदायातील फडमालक,दिंडी मालक,व मठप्रमुखांनी या कठीण काळात लाखो वारकर्यांचे आरोग्यहित डोळ्यापुढे ठेवून व प्रशासनास कोणताही भार पडू न देता 'सोशल डिस्टनस्' या प्रशासकीय व 'पडता जडभारी । नेमा न टळे निर्धारी।। या संप्रदायाचे नियमांचा अचूक समन्वय साधत आपल्या चैत्र शुद्ध एकादशी च्या नगरप्रदक्षिणेचा नियम पुर्ण करत लाखो वारकऱ्यांची वारी श्रीविठ्ठलाचे चरणी समर्पित केली .देशाच्या इतिहासात वारकरी संप्रदायाने राष्ट्रहितासाठी कुठलाही अनाठायी अट्टाहास नकरता केलेला हा 'अपूर्व त्याग' कधीच विसरता येणार नाही. - रामकृष्ण हनुमंत महाराज वीर राष्ट्रीय प्रवक्ता: वारकरी संप्रदाय पाईक संघ. चैत्र एकादशी निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेस रामभाऊ जांभूळकर या भाविकाने १ लाख गुलब फुलांची आकर्षक आरास केली. यामुळे देवाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले.