|| हर्षद कशाळकर

मासेमारीसाठी एलईडी दिव्यांच्या वापर करण्यात केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र शासनाच्या परिपत्रकानंतरही एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्याचे प्रकार थाबल्याचे दिसून येत नाही. कोर्लई जवळच्या समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करणावरून दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यामुळे बंदीनंतरही मच्छीमारांकडून जास्त मासे मिळावे यासाठी एलईडी दिव्यांचा वापर सुरुच असल्याचे दिसून येत आहे. शासनाने अशा पध्दतीने होणारया मासेमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

रात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासमारी करतांना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. लाईटमुळे आकर्षति होऊन मासे जाळ्यात अलगद सापडत असत. मात्र यामुळे लहानमोठ्या सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोलसमुद्रात मासेमारी करतांना एलईडी बल्बचा वापर करण्यास र्निबध घालावेत अशी माणगी रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांनी केली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने २९ ऑगस्ट २०१६ ला काही अटी व शर्तीसह एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी केंद्र सरकारने रद्द केली आहे. देशभरातील कुठल्याच किनारयांवर आता एलईडी बल्ब्सच्या साह्याने मासेमारी करता येणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले.

एलईडी मासेमारी पध्दतीमुळे समुद्रातील माश्यांचे प्रमाण कमी होईल त्याचबरोबर संपूर्ण सागरी जैवविविधताच धोक्यात येईल अशी भिती व्यक्त केली जात होती. किनारपट्ट्यावर होणारी बांधकाम, खारफुटींची कत्तल, खाडी किनारयावर होणारे भराव, डिझेलचे वाढते दर, मजुरांची कमतरता, महागाई आणि हवामानातील बदल यामुळे आधीच मासेमारी अडचणीत सापडली आहे. अशात मत्स्यप्रजातींचे अस्तित्वच धोक्यात आल्यास त्याचा मोठा परिणाम स्थानिक मच्छीमारांना भोगावा लागण्याची शक्यता होती. त्यामुळे करंजा येथील मच्छीमार संघटनेनी केंद्रसरकारकडे एलईडी लाईट मासेमारीवर र्निबध घालण्याची विनंती केली होती. या मागणी नुसार केंद्र सरकारने अशा पध्दतीने होणारया मासेमारीवर र्निबध घातले आहेत. मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणारया मच्छीमार संस्थावर कारवाई करण्यात येईल असेही जाहीर केले आहे.  ज्या मच्छीमार संस्था एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करणारया बोटींना संरक्षण देतील त्यांना शासनाकडून पुरविण्यात येणारया सुविधा रद्द करण्यात येतील अशी तंबी त्यांनी दिली होती. मे महिन्यात १२ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई देखील केली होती.

मात्र बंदीनंतरही जास्त मासे मिळावे या हव्यासातून रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी सुरुच आहे. कोर्लई येथे समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करणारी एक बोट मच्छीमारांना दिसून आली. त्यांनी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करणारया बोटीस हटकले यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यामुळे शासनाने अशा पध्दतीने होणारया मासेमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

रायगड जिल्ह्याला २२४ किलोमिटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनारयावर मासेमारी बोटीवंर लक्ष्य ठेवण्यासाठी एकच बोट सध्या कार्यरत आहे. रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. याचा फायदा घेऊन काही मच्छीमार रात्री एलईडी दिव्यांचा वापर करून खोल समुद्रात मासेमारी करत आहेत.

शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही जर मासेमारीसाठी या दिव्यांचा वापर केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांचे परवाने रद्द केले जातील, डिझेल पुरवठा बंद होईल, वेळ पडल्यास फौजदारी कारवाई करण्याची आमची तयारी आहे.  –  अभयसिंह शिंदे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त