अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे. यावर भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपानं कोणत्याही प्रकारची फुस लावल्याचा आरोप चुकीचा आहे. जैसी करनी वैसी भरनी असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

महाविकास आघाडीचं लक्ष केवळ खुर्चीवर आहे. खातेवाटपावरूनही महाविकास आघाडीत भांडण सुरू होतं, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी सत्तेसाठी कोणतेही निर्णय घेत सरकार स्थापन केलं त्या ठिकाणी असंच होणार, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील असं सूचक वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देणार असल्याची त्यांना आशा होती. त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.