करोना संसर्गामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील औद्योगिक, पर्यटन, शेतकरी आदी क्षेत्रातील अर्थकारण बिघडले आहे. करोना संसर्गाची मोठी भीती लोकांच्या मनात आहे. यासाठी जनतेच्या मोफत लसीकरणाची स्वतंत्र मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे.

वाई नगरपालिकेच्या सभागृहात आमदार मकरंद पाटील यांनी पुढील महिन्यात मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या मोफत लसीकरण मोहिमेबाबत बैठक बोलाविली होती. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, मुख्याधिकारी विद्या पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप यादव, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व नगरसेवक आदी उपस्थित होते.

यावेळी, “करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोक बाधित झाली असून, शेकडो कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. लोकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे बंद पडले आणि अर्थकारण बिघडले. यापुढे तिसरी लाट येण्याचा धोका आहे यामध्ये जास्तीत जास्त लहान मुले बाधित होतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मतदारसंघात आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करत आहोत व केल्या ही आहेत. लसीकरण झालेल्या व्यक्तीला करोना होत नाही आणि झाला तरी त्याचा मृत्यू होत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. यासाठी लसीकरण हाच उपाय आहे . परंतु पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या लोकांमध्ये लसीकरणाबाबत तीव्र असंतोष आहे. लस उपलब्ध होण्यामध्ये अनियमितता आहे. एकूणच लोकांचे जनजीवन आणि अर्थकारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर लस उपलब्ध करून देण्यासाठी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. त्याप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर जाधव यांच्या बरोबर माझे बोलणे झाले. त्यांनी लस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. तरी, यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समित्या नगरपालिका तसेच उद्योजक बँका पतसंस्था यांनी सहकार्य करावे.” असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

“नगरपालिकांचा निधी उपलब्ध होण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज महाबळेश्वरच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण विरहित व पक्षीय हीत बाजूला ठेवून योगदान द्यावे.”, असे आवाहन देखील आमदार पाटील यांनी केले आहे.