कराड : करोनाच्या संकटकाळात जगभरातील राष्ट्रांनी आपल्या जनतेला थेट मदत दिली. पण, केंद्र सरकारने २१ लाख कोटींच्या पॅकेजमध्ये १९ लाख कोटींची कर्जे घेण्याचे सुचवून जनतेच्या तोंडाला पाने पुसली.  करोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा, त्याच्या किमतींचा घोळ याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, तर इंधन दरवाढीमागे केंद्र सरकारची उत्पादन शुल्कवाढ हे कारण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर सतत ढासळतोय, तो गतवर्षी उणे राहिला. माध्यमांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करत याबाबत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांबरोबरच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस देशभर आवाज उठवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. मात्र, इंधनाचे दर उच्चांकी भडकत असून, त्यामागे केंद्र सरकारची उत्पादन शुल्कवाढ हेच कारण आहे. या पैशातून ते आपला तोटा भरून काढत आहे.

केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, सन २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत १४५ डॉलपर्यंत वाढली. तरीही पेट्रोल, डिझेलचे दर मर्यादित राहिले होते. मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या बॅरलची किमती ५० डॉलर दरम्यान असताना लिटरला पेट्रोल शंभर, तर डिझेल ९२ रुपयांवर, तसेच स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांवर पोहोचला आहे.