कोल्हापूर : राज्यातील दुधाचे दर घसरल्याने भाजपने १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे ठरवले असताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर या आंदोलनावरून निशाणा साधला. फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत आहेत. त्यांना नेमके काय झाले आहे, हेच समजत नाही, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

भाजपाचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्य आहे. दुधाला दर मिळालाच पाहिजे, असा उल्लेख करून मुश्रीफ गडहिंग्लज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, परंतु त्यांनी आंदोलनासाठी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. उद्या शासकीय सुटीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे. अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?, असे म्हणत मुश्रीफ यांनी भाजपचे आंदोलन बेदखल ठरवले.

फडणवीस यांचे मुहुर्त नेहमीच चुकीचे ठरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणी बैठकीत बेईमान म्हणत टीका केली होती. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अपशकून करण्याची ही कुठली संस्कृती? असा सवालही मुश्रीफ यांनी केला.

कोल्हापूर समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांनी काळजी घेतली नाही तर करोना महामारीचा विस्फोट कोणीही रोखू शकत नाही. शहरांसह खेडोपाडी ग्राम दक्षता समितीच्या वतीने घरोघरी तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.