साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज त्वरीत मिळाले पाहिजे व अशा कर्जास हमीची आवश्यकता लागेल, तर कारखान्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी. अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गाळप हंगाम २०२०-२१ च्या पार्श्वभूमीवर साखर संकुल, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी साखर आयुक्त सौरव राव(भाप्रसे), सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था अनिल कवडे(भाप्रसे), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावरील संभाव्य गाळप व हंगामात सुरू होणारे साखर कारखाने, त्यांना पूर्व हंगामी, अल्प मुदतीची कर्ज मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी व या कारखान्यांना शासन धोरणानुसार अशा कर्जाला द्यावी लागणारी हमी, याबाबत कोणती कार्यवाही चालू आहे, याचा सविस्तर आढावा यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.