अवकाळी पावसामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ासह पूर्व विदर्भातील धान पीक तसेच पूर्व व पश्चिम विदर्भातील कापूस, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पीक संकटात सापडले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना विदर्भात अद्यापही पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी दंग असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा आदेश रद्द करावा, अशीही मागणी केली आहे. विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे, यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग घोंघावत होते. पंरतु, नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीच्या पूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. त्याचे पुंजने तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी जावू द्यावा लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने या कडपा भिजल्या आहेत. भारी धान अजूनही शेतात उभा आहे. २९ ऑक्टोबर आणि त्यांनतर येत असलेल्या परतीच्या पावसामुळे संपूर्ण धान पीक आडवा पडून नष्ट झालेला आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामूळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे. धान, सोयाबिन, कापूस, ज्वारी यासह अनेक पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.