एकीकडे दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना पंढरीत आनंदोत्सव साजरा झाला. राज्य सरकारच्या मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे पंढरीत स्वागत करण्यात आले. येथील मंदिर परिसरातील व्यापारी,भक्त,महाराज मंडळीने फटाके,पेढे,लाडू वाटप केले. १७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद केले होते. आता १६ नोव्हेंबरला मंदिर उघडणार असल्याने भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

करोनाचे संकटात १७ मार्च रोजी राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. यात पंढरीचे श्री विठ्ठल मंदिर देखील बंद ठेवण्यात आले. त्यानंतर आलेल्या माघी आणि आषाढी वारीवर अनेक निर्बंध आले. लाखो भाविकांनी तसेच महाराज मंडळींनी सरकारच्या या निर्णयाचे पालन करीत वारकरी संप्रदायातील सहिष्णुतेचे दर्शन घडवले. आता कारोंचे संकट कमी होऊ लागताच मंदिरे खुली करा अशी मागणी जोर धरत होती.आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच दि १६ नोव्हेंबरला मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाची वार्ता पंढरीत येताच एक आगळा वेगळा आनंदोत्सव साजरा झाला. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करून निर्णयाचे स्वागत केले. गेले सात महिने मंदिर बंद होते.तर दुसरीकडे ज्या महाराज मंडळीनी विठ्ठलाप्रती भक्ती असली तरी सहिष्णुता दाखवत शेकडो वर्षांच्या परंपरा खंडित करीत आपले दुख,वियोग दूर ठेवला. या निर्णयाचे स्वागत करताना ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी सरकारचे आभार मानले.

दरम्यान,राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना येतील त्या प्रमाणे भाविकांना दर्शन देवू असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. असे असले तरी आता भेटी लागे जीवा लागलीस आस या अभंगा प्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ आता भाविकांना लागली आहे.