जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडाच्या तपासाला अजूनही गती मिळालेली नाही. पोलिसांनी आता सहा संशयितांच्या नाकरे चाचणीची परवानगी न्यायालयाकडे मागितल्याचे समजते. त्यामुळे तपासातील अपयशच ठळकपणे अधोरेखित होत आहे. दरम्यान नाकरे चाचणीच्या परवानगीबाबतही पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली असून त्याला दुजोराही दिलेला नाही.
या हत्याकांडाला आता तब्बल अठरा दिवस झाले आहेत. मात्र पोलिसांना आरोपींबाबत कोणतेच धागेदोरे अद्यापि मिळालेले नाहीत. पोलिस तपासाच्या जवळपासही पोहोचले नाहीत. जिल्ह्य़ात हाच आता टीकेचा विषय बनला असून सहा संशयितांच्या नाकरे चाचणीची परवानगी मागताना पोलिसांनी एका अर्थाने तपासातील असमर्थतताच स्पष्ट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सहा जणांमध्ये एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी, नगर येथील एका संघटनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता आणि पिडीत जाधव कुटुंबातीलही तिघांचा समावेश असल्याचे समजते. त्यांच्या नाकरे चाचणीसाठी परवानगी मागणारा अर्ज पोलिसांनी शुक्रवारीच पाथर्डी येथील न्यायालयात दाखल केल्याचे समजते. मात्र त्याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे गेल्या दि. २० ला संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), त्यांची पत्नी जयश्री (३८) व मुलगा सुनील (१८) अशा तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुढच्या दिवशी ही घटना लक्षात आली. त्यावर राज्यभर संताप व्यक्त होत असून एवढा गदारोळ झाला तरी, पोलिसांना या हत्याकांडाचे कोणतेच धागेदोरे अद्यापि मिळालेले नाहीत. घटनेनंतर लगेचच विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके हेही या गावात तळ ठोकून आहेत, शिवाय मोठा ताफा येथे तैनात करण्यात आला आहे. तरीही तपासाला गती न मिळाली नसतानाच आता पोलिसांनी काही संशयितांच्या नाकरे चाचणीची परवानगी मागितल्याने तपासातील हतबलताच अधोरेखीत झाल्याचे मानले जाते.