उलाढाल अर्ध्यावर आल्याने बेरोजगारीचे संकट प्रबोध देशपांडे, अकोला शुद्ध चांदीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या खामगावमधील चांदीच्या व्यवसायाला मंदीचा चांगलाच फटका बसला असून बाजारपेठेतील उलाढाल अर्ध्यावर आली आहे. त्यामुळे कारागिरांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला. चांदीचे दागिने व वस्तूंसाठी खामगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. रजतनगरी अशीही खामगावची ओळख. येथे शुद्ध चांदीच्या मूर्ती, दागिने, ताट-वाटी, फूलपात्र, सिंहासन, शिक्के, मंदिर, कळस यासह नक्षीकाम असलेल्या वस्तूंची निर्मिती होते. याला राज्यासह इतरही भागात मोठी मागणी असते. खामगावातील चांदीच्या वस्तूंनी नामवंत कलावंत, राजकीय नेत्यांच्या घराची शोभा वाढवली. शेगावातील संत गजानन महाराज मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, नांदेड येथील गुरुद्वारा आदी धार्मिकस्थळांच्या ठिकाणीही खामगावातील चांदीपासून कळस, मूर्ती व इतरही वस्तू साकारल्या आहेत. संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या खामगावच्या चांदी बाजारपेठेवर मंदीमुळे अवकळा आल्याची परिस्थिती आहे. खामगावात चांदीचे सुमारे २५ मोठे व्यावसायिक आहेत. काही महिन्यांपूर्वी या बाजारपेठेत महिन्याकाठी १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असे. सुमारे २० हजार किलो चांदीचा वापर करून तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री होत होती. मात्र, मंदीमुळे उलाढाल ५० कोटी पर्यंत उतरली आहे. जीएसटी व नोटाबंदीचाही मोठा प्रभाव झाला आहे. चांदी व्यवसायातील एवढी घसरण प्रथमच अनुभवल्याचे व्यावसायिक सांगतात. चांदीच्या आखिव-रेखिव वस्तू तयार करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते. त्यामुळे खामगावात शंभराहून अधिक कारागिरांना रोजगार मिळाला. येथे स्थानिक कारागिरांसोबत उत्तम प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगालचे कुशल कारागीर कार्यरत आहेत. मंदीमुळे या कारागिरांच्या रोजगारावरही गंडांतर आले आहे. सणासुदीच्या काळात गजबणाऱ्या बाजारपेठेमध्ये सध्या शांतता आहे. गणेशोत्सवात फारशी उलाढाल झाली नाही. आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवळीत तरी बाजारपेठ उभारी घेण्याची अपेक्षा आहे. अस्थिर भावाचाही परिणाम चांदीच्या व्यवसायावर अस्थिर भावाचाही परिणाम झाल्याचे दिसून येते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सोने व चांदीच्या भावात तेजी आहे. भाव सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यात ३६ ते ३७ हजार रुपये किलो असणारी चांदी आता ४८ हजारांच्या घरात पोहोचली. व्यवसाय घसरण्यामागे तेजीही जबाबदार असल्याचे व्यावसायिक सांगतात. गेल्या काही दिवसांमध्ये खामगावातील चांदीचा व्यवसाय अर्ध्यावर आला. बाजारपेठेतील उलाढाल प्रभावित झाली असून, ग्राहकांकडून होणारी मागणी मोठय़ा प्रमाणात कमी झाली. अस्थिर भावामुळेही विक्रीवर परिणाम दिसून आला. - डॉ. जांगीड, चांदीचे व्यावसायिक, खामगाव.