कोल्हापुरातील पंचगंगा नदीची आज सायंकाळी ४ वाजता पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर होती. तर इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. आज सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील ९९ बंधारे पाण्याखाली गेले होते .
तर एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील १५ मार्ग बंद झाले आहेत.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका जाणवू लागला आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज(बुधवार) झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना महापूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापुरमधील कळंबात तलाव ओसंडून वाहत आहे तर न्यू कॉलेज परिसर जलमय झालेला आहे.

नदीकाठच्या गावांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना
मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आज रात्री कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ओलांडली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेषता चिखली,आंबेवाडी ग्रामस्थांनी त्वरित स्थलांतरित व्हावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी आजच्या बैठकीतून केले आहे.

दरम्यान, चंदगड तालुक्यातील वाघोली येथे घराची पडझड होऊन ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कसबा बावडा येथे एक गोटा पडला आहे. तर पन्हाळ्या तालुक्यातील जोतिबा-केर्ली मार्गावरील रस्ता खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यापूर्वीही हा रस्ता खचला होता.