कोल्हापूरमध्ये खासगी एसी बसला आग लागून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृत प्रवासी हे पुण्याचे रहिवासी असल्याचे समजते.

आत्माराम ट्रॅव्हल्सची एसी बस गोव्यावरुन कोल्हापूर- पुणे मार्गे मुंबईला येत होती. गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाजवळ पहाटे साडे चारच्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. बस चालकाला हा प्रकार लक्षात येताच त्याने प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र, आग वेगाने पसरत गेली आणि २ प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झाला. तर १८ प्रवाशांना बसमधून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यादरम्यान काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बंटी भट आणि विकी भट अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बसच्या एसीत तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे एसी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.