कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात करोनाचे ११०० पेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाची साखळी तोडण्यासाठी जनता टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय आज(शुक्रवार) घेण्यात आला आहे. रविवार, ६ ते मंगळवार १५ सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये कागल तालुक्यात जनता ताळेबंदी लागू करण्यात आली आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जाहीर केले.

कागल येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, करोनाचा कहर रोखण्यासाठी जनता ताळेबंदी लागू करावी, अशी मागणी होत होती. सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पूर्वजांचे स्मरण करण्याचे हे दिवस आहेत. घरात राहून पूर्वजांचे स्मरण करूया. या काळात दूध, औषधी आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहतील. बँका बंद व एटीएम सुरू राहतील. सरकारी निमसरकारी व खासगी कंपनीमध्ये जाणारे नोकर आपली ओळखपत्रं दाखवून जाऊ शकतील. मास्क सर्वांना बंधनकारकच आहे. लोकांनी घरात राहून साखळी तोडून दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील उपस्थित होते.