कराड : पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरण क्षेत्रासह सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. सलग कोसळणाऱ्या १३ दिवसांतील पावसाने जून महिन्यातील तूट भरून काढताना, जलसाठय़ांमध्ये लक्षणीय वाढ नोंदली आहे. परिणामी बळिराजासह सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोयनेच्या पाणलोटात गतखेपेपेक्षा जादाचा पाऊस झाला आहे. परंतु, मान्सूनच्या आगमनापूर्वी धरणसाठा तुलनेत कमी असल्याने कोयनेसह ठिकठिकाणच्या जलाशयांची टक्केवारी गतवर्षांपेक्षा कमीचीच दिसून येत आहे. गतखेपेस आजमितीला निम्म्यावर भरलेल्या कोयना धरणाचा जलसाठा एक तृतीयांशहून अधिकचा झाला आहे. गेल्या १३ दिवसांत कोयनेचा जलसाठा तिपटीहून अधिक वधारला असून, पाथरपुंजला सर्वाधिक २,१७४ मि.मी. पाऊस कोसळला आहे. सततच्या दमदार पावसाने खरीप पिकांच्या पेरण्यांनी चांगलीच गती घेतली आहे. तर, सध्या १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणाचा जलसाठा ३५.११ (३३.३६ टक्के) नोंदला गेला असून, जलाशयात जवळपास ३३ हजार क्युसेक आवक होत आहे. कोयना जलग्रहण क्षेत्रात बुधवारी दिवसभरात सरासरी ७०.३३ एकूण १,८२७ मि. मी. (एकूण सरासरीच्या ३६.५४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजमितील कोयनेच्या पाणलोटात एकूण १,७६८.२ मि.मी. (एकूण सरासरीच्या ३५.३७ टक्के) पावसाची नोंद झाली होती. वारणा धरण ४४ टक्के तर राधानगरी निम्याहून अधिक भरले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांच्या जलसाठय़ांमध्ये १ टीएमसीने घसघशीत वाढ होताना खडकवासला धरण ९०.४० टक्के भरल्याने लवकरच या धरणातून जलविसर्ग करणे अपरिहार्य बनले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणाचा जलसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्यांची टक्केवारी अशी- कोयना ३५.११ (३३.६६), वारणा १४ (४४), राधानगरी ४.४५ (५३), दूधगंगा ७.०६ (२८), तुळशी १.६० (४६), धोम ३.९१ (२९), कण्हेर ४.४१ (४४), तारळी २.८० (४८), धोम-बलकवडी १.६० (३९.२८), उरमोडी ३.५ (३१), मोरणा १ (७०), तर सोलापूर जिल्ह्यतील उजनी धरणाचा पाणीसाठा गेल्या २४ तासांत २.३५ टीएमसीने वाढून उणे २५.०७ टीएमसी (उणे ४६.८० टक्के) अशी जलसाठय़ांची ताजी आकडेवारी आहे.