कराड येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. जर मोदींची खरंच ५६ इंचाची छाती असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राफेल प्रकरणात चौकशीला हे सरकार का घाबरत आहे, असे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांनी देश मजबूत केला. विमानाचे कारखाने काढले, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या सरकारच्या काळात ५० टक्के शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाहीत. हे मी भविष्यवेत्ता म्हणून सांगत नाही तर राजकीय विश्लेषक म्हणून सांगतोय, असे म्हटले.