माधव भंडारी यांचे स्पष्टीकरण

सदाभाऊ खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्याच शिफारसीने आमदार करून मंत्रिपदाची संधी दिली असून, संघटनेत फूट पाडण्याचा भाजपवरील आरोप निराधार असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मतदानयंत्राबाबत होणारी आंदोलने हा रडीचा डाव असल्याचेही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी भाजप अन्य पक्षांतील लोकांना प्रलोभने दाखवून फूट पाडत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की त्यांच्या संघटनेला सत्तेत वाटा देण्याचे ठरले होते. यानुसार शेट्टी यांच्याच शिफारसीनुसार खोत यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. पुन्हा त्यांच्याच शिफारशीने राज्यमंत्रीही करण्यात आले असताना असा आरोप निराधार म्हणावा लागेल. अन्य मित्रपक्षांची ताकद कमी करण्याची भाजपला गरजच काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत ईव्हीएस मशिनबाबत राज्यभर निदर्शने तक्रारी सुरू आहेत. याबाबत विचारले असता राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतरच मतदानयंत्राबाबत साशंकता निर्माण करून आंदोलने करण्यात येत आहेत. या प्रक्रियेबाबत योग्य तो मार्ग उपलब्ध असताना आंदोलन करून स्टंटबाजी करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने चच्रेचे दरवाजे खुले ठेवले असून, त्यांनीच चच्रेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शिवसेनेनेच युती तोडली असून, पुन्हा चर्चा सुरू करण्याची त्यांचीच जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.