राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी राज्य सरकारने करोनावर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र फक्त सरकार काहीच करु शकत नाही. आम्हाला यासाठी लोकांच्या मदतीची गरज आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

पत्रकारांनी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी गावाकडील लग्नसमारंभांचे उदाहरण दिले. “ग्रामीण भागामध्ये लग्नात पाच ते दहा हजार लोकं दिसू लागलेत. करोनाचे रुग्ण वाढत आहे हे आम्हाला मान्य आहे पण सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. तरी सरकार एकटच काही करु शकत नाही. लोकांनी यामध्ये सहकार्य करणं महत्वाचं आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अनेकजण मास्क घालत नसल्याचे किंवा आरोग्यासंदर्भातील नियम पाळत नसल्याने जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे, त्यामुळे अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.