६ जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन. या दिनालाच राज्य शासनाने 'शिवस्वराज्य दिन' असे नाव देवून या वर्षीपासून प्रथमच शासकीय कार्यालयात हा दिन राज्यभर साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांना शिवस्वराज्य दिन करोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रथमच हा दिन साताऱ्यातील ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले. किल्ले रायगडावर दि. ६ जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा झाला. तोच दिवस महाराष्ट्रात शिवभक्त, शिवप्रेमी शिवराज्यभिषेक दिन म्हणून मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. यावर्षी मात्र शासन पातळीवर राज्यभर ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला परिपत्रक मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना आणि जिह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिह्यातील १४९६ गावांतल्या ग्रामपंचायतीमध्ये ११ पंचायत समितीत व जिल्हा परिषदेत हा दिन साजर होणार आहे. राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख दिन साजरा करण्यासाठी नियमावली स्वराज्यदिनासाठी ध्वज संहिता ठरवली असून ध्वज हा तीन फुट रुंद आणि सहा फुट लांब या प्रमाणात असावा ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता ठरवली असून त्यामध्ये शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी १५ फुट उंचीचा वासा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला पाच ते सहा फुटाचा आधार द्यावा, त्याकरता सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद वापर करावा ६ जुन रोजी सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्यध्वज बांधून घ्यावा, त्यावर सुवर्ण कलश बांधावा, त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी. सुर्यास्तावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवून द्यावा.