अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जर कोणत्याही व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. परंतु कृपया करून या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यापूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयनं हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी केलं भाष्य; म्हणाले…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते’ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “सत्याचा विजय होईल,” एफआयआर दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर

तीन ठिकाणांहून तपास

सुशांतच्या आत्महत्येचा तीन यंत्रणा तपात करत आहेत. आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटणात रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे बिहार पोलिसांनीही या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर सुशांतच्या वडिलांनी १५ कोटी रुपये उकळल्याचा आरोप रियावर केल्यानं ईडीनं आर्थिक गैरव्यवहाराच्या अंगानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.