लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जात आहे. लोक घराबाहेर पडणार नाही, यासाठी सरकारकडून आवाहन करण्याबरोबरच पोलीस कारवाईही केली जात आहे. त्यामुळे सगळीकडं शुकशुकाट असून, महामार्गावरून केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे वाहनेच धावत आहेत. लॉकडाउन असलेल्या परिस्थितीत ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान हे कुटुंब आणि इतरांसह सुटीसाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं. पाचगणी पोलिसांनी कपिल वाधवान यांच्या २३ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना प्रवास करु द्यावा, अशा आशयाचं गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या स्वाक्षरीचं पत्रही समोर आलं. हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांचे ट्विट-

हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करणारं पहिलं ट्विट केलं. त्यात ‘वाधवान यांच्यासह २३ जण महाबळेश्वरला कसे पोहोचले याची चौकशी केली जाईल,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर चार तासांनी गृहमंत्री देशमुख यांनी दुसरं ट्विट केलं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रमाणे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात चौकशी केली जाणार असून, चौकशी होईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

अमिताभ गुप्ता यांच्या पत्रात नेमकं काय?

हे प्रकरण उघड झाल्यावर आल्यानंतर वाधवान कुटुंबियांना परवानगी देणारं गृह विभागाचे विशेष सचिव आणि अतिरिक्त डीजीपी अमिताभ गुप्ता यांचं पत्रही माध्यमातून समोर आलं आहे.

या पत्रात वाधवान हे आपले मित्र असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाऊ द्यावे, असं म्हटलेलं आहे.