आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी कोल्हापूर येथे करण्यात आली.

भव्य मराठा मोर्चे काढल्यानंतर यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्र क्रांती सेनेची रायरेश्वर येते स्थापना करण्यात आली. या पक्षाकडून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार आहेत. सोमवारी कोल्हापूरात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दरम्यान, साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसले हे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार नसतील तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा आणि विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले होते.