महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी अनेकदा पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. राज्यामध्ये सध्ये लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीय तर जिथे लसीकरण सुरु आहे तिथेही लसींच्या कमतरतेची चिंता व्यक्त केली जातेय. एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतरच करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दीड कोटी लोकांचे लसीकरण झालं आहे. “महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या नऊ कोटी इतकी आहे मात्र लसीकरण केवळ दीड कोटी लोकांचं झालं आहे. ही संख्या खूप कमी आहे,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पुढे बोलताना या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील भीती व्यक्त केलीय. “आपण वेगाने लसीकरण केलं नाही तर लोक नोकऱ्या आणि इतर कामांसाठी आता घराबाहेर पडू लागतील आणि त्यामधून करोनाची तिसरी लाट येईल,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

“डिसेंबरमध्ये लोकांना सूट देण्यात आल्याने ते बेजबादार झाले आणि त्यामुळेच फेब्रुवारीत दुसरी लाट आली. सध्या राज्यात दुसऱ्या लाटेचा कहर दिसून येतोय,” असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “आपण मोठ्या संख्येने एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केलं नाही तर ते तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं होईल,” असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यात करोनाचे १५ लाख ५३ हजार ९२२ रुग्ण आढळून आलेत. ११ हजार २८१ जणांचा यामुळे मृत्यू झालाय. टोपेंनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार २० मेच्या आधी भारत बायोटेक किंवा सीरमकडून लसी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच “अशा परिस्थितीत आम्ही एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण करु शकणार नाही. आम्हाला मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे,” असं टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

करोनासंदर्भातील राज्यातील समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार लसी उपलब्ध असत्या तर अधिक लोकांचे लसीकरण राज्याने केलं असतं. “पावसाळा सुरु झाल्यानंतर पाऊस आणि इतर समस्यांबरोबरच लसीकरण मोहीम चालवणे आव्हानात्मक होईल,” असंही या सदस्याने म्हटलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने करोनामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याची सुवर्णसंधी आपण गमावलीय, असं म्हटलं आहे.

करोना विषाणूच्या जीनोम रचनेसंदर्भात काम करणाऱ्या एका संशोधकाने हा विषाणू अशापद्धतीने म्यूटेड होत राहिला म्हणजेच बदलत राहिला तर लसीकरणाचा काहीच फायदा होणार नाही. “लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला तर करोना नवा विषाणू निर्माण होईल ज्याच्यावर लसीचा काही परिणाम होणार नाही,” असंही या वैज्ञानिकाने म्हटलं आहे.