राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील तीन दिवसातील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्या वर आढळून आल्यानंतर, आज यामध्ये काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले. शिवाय करोनातून बरे होणाऱ्यांची संख्येत देखील वाढ दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३९७ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याशिवाय राज्यात आज ३० रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती गृहविलगीकरणात  आहेत, तर ३,४८२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच,  राज्यात आज रोजी एकूण ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आज (सोमवार)पासून सुरू झाला आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून

पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.