राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. याचबरोबर, करोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात १३ हजार ७१४ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, आज राज्यात १० हजार २२६ नवे करोनाबाधित आढळले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण १५ लाख ६४ हजार ६१५ करोनाबाधितांमध्ये १ लाख ९२ हजार ४५९ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १३ लाख ३० हजार ४८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४१ हजार १९६ जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

सद्यस्थितीस राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २३ हजार १८३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आजपर्यंत तपासणी झालेल्या ७९ लाख १४ हजार ६५१ नमून्यांपैकी १५ लाख ६४ हजार ६१५ नमूने (१९.७१ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.