महाराष्ट्रात दिवसभरात ६ हजार ७७६ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८१ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर २७ मृत्यू हे मागील आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.