चंद्रपूर : २० वर्षांपासून बेपत्ता असलेले कोठारी येथील राजाराम पोचूजी बोनगिरवार (४१) यांचा इंटरनेटच्या माध्यमातून शोध लागला आहे. कोलकाता येथे ते मिळून आले असून रविवारीच त्यांना चंद्रपूर येथे आणण्यात आले.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी असलेले राजाराम बोनगिरवार १९९८ला अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा बराच शोध घेतल्यानंतर ते मिळाले नाहीत. मात्र, अशातच २० वर्षांनंतर आठ दिवसांपूर्वी कोलकाता कॉकद्वीप येथील रहिवासी अम्रीश नागबिश्वास यांचा कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यासोबत संपर्क झाला. यावेळी नागबिश्वास यांनी ठाणेदारांना सांगितले की, मकरसंक्रांती मेळाव्यात गंगासागर येथे एक वृद्ध व्यक्ती आजारी पडलेली दिसून आली. या वृद्ध व्यक्तीकडे विचारणा केली असता तो फक्त कोठारी एवढेच सांगत आहे. त्यानंतर इंटरनेटद्वारे माहिती घेतली असता कोठारी या गावाची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे कोठारी ठाणेदारांनी पोलिसांच्या दृष्टीने प्रकरणाचे गांभीर्य समजून जुने रेकार्ड शोधले असता १९९८ला बेपत्ता झालेले राजाराम बोनगिरवार हे बेपत्ता असल्याचे दिसून आले. तेव्हा याबद्दल ठाणेदारांनी कोलकाता येथे नागबिश्वास यांना माहिती दिली. सर्व चौकशीनंतर ही व्यक्ती राजाराम बोनगिरवार आहेत, हे स्पष्ट झाले. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक कोलकाता येथे रवाना केले. त्यानंतर बोनगिरवार यांना सुखरूप ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे आणले. मानसिक अस्वस्थतेमुळे ते घरदार, संसार सोडून भटकत राहिले. २० वर्षांनंतर हरवलेला व्यक्ती मिळाल्याने पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन राजाराम यांना सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांचा सुपूर्द करण्यात आले. वीस वर्षांनंतर घरातील व्यक्ती परत आल्याने कुटुंबात भावनिक व आनंदाचे वातावरण आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभाागीय पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात श्याम पुलगमकर व विनोद निखाडे यांनी केली आहे.