मराठा आरक्षणाची घोषणा होताच आता त्यावरुन श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हं आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय असल्याचं म्हटलं आहे. मी सुद्धा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. त्यामुळे हा माझाही विजय आहे असं राणे म्हणालेत.

आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते न्यायालयात टिकू शकलं नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालानं दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचं राणेंनी म्हटलं. सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले. याचं श्रेय मराठा समाज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पाहिजे. मराठांच्या प्रगतीचा आता मार्ग मोकळा झाला आहे. मराठा समाजाला आता नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे. मीही याआधी मराठा आरक्षणाचा अहवाल मांडला होता. तेव्हा अहवालात याच तरतुदी होत्या. त्याच तरतुदी मागसवर्गाच्या अहवालात मांडण्यात आल्या आहे. त्यामुळे हा विजय माझाही आहे, असं यावेळी राणे म्हणाले.

बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा एसईबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.