५० कोटी जमा करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असा इशाराच मुंबई हायकोर्टाने प्रथितयश बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिला होता. मात्र सोमवारी मुंबई हायकोर्टाने डी. एस कुलकर्णींना  ५० कोटी जमा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमुळे तूर्तास तरी त्यांची अटक आणि तुरुंगवास टळला आहे. १९ डिसेंबरपर्यंत डी. एस. कुलकर्णींना ५० कोटी जमा करायचे आहेत. मात्र १९ डिसेंबर पर्यंत त्यांनी हे पैसे भरले नाहीत तर मात्र त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सरकारी वकिलांनी १५ दिवसांच्या कालावधीवर आक्षेप घेतल्याचीही माहिती समजते आहे. १५ दिवस ही खूप मोठी मुदत आहे असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची भरपाई या ५० कोटींमधून केली जाणार आहे. या संदर्भातले प्रतिज्ञापत्र आज डीएकेंना हायकोर्टात सादर करायचे होते. तसेच जी संपत्ती विकता येईल त्याची यादीही देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सोमवारी कोर्टात काय होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र कोर्टाने तूर्तास तरी डीएसकेंना १५ दिवसांचा दिलासा दिला आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

तीन हजार गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर आहे

मात्र ठेवीदारांची कोणतीही फसवणूक केली नसून पैसे परत करणार आहोत असे डीएसकेंनी म्हटले आहे

गेल्या गुरुवारी डीएसकेंना उत्तर मागत अवघ्या एक तासाची मुदत हायकोर्टाने पैसे जमा करण्यासाठी दिली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र डीएसके हे मराठी व्यावसायिक आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवले जात आहे असे म्हणत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.