राज्यमंत्री केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला! सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढत आहे. या ठिकाणी तिंरगी लढत होत असून, काँग्रेस पक्ष सेना-भाजपच्या मतविभागणीचा फायदा घेऊ पाहत आहे. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सेना-भाजप युतीची बोलणी केली, पण युती होऊ दिली नाही, त्यामुळे या दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. भाजप पक्ष प्रथमच या ठिकाणी स्वबळावर लढत देत आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार असताना दीपक केसरकर यांनी १७ जागावरही यश मिळवून विरोधकांना पाणी पाजले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अडीच वर्षांपूर्वी सेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते आमदार होऊन राज्यमंत्री व पालकमंत्रीही बनले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची ताकद अजमवण्यासाठी स्वबळावर रिंगणात आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवीत असून दोन राज्यमंत्री त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. राज्यमंत्री केसरकर यांच्या होमपिचवरील ही निवडणूक असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार असले तरी सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्यांचे सावंतवाडीशी नाते आहे. त्यांना भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली व युवा नेते संदेश पारकर साथ देत आहेत. भाजपचा प्रचार हायटेक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घातलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी डोंबिवली, मुंबईतून राज्यमंत्री चव्हाण यांनी आणून प्रचारात रंगत आणली आहे. भाजपाने टक्कर दिल्याने शिवसेनेलाच त्याचा त्रास होईल अशा अंदाजाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने प्रचारात भर दिला आहे. नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आम. नितेश राणे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आघाडीच्या प्रचारावर भर दिला आहे. सावंतवाडीत नगराध्यक्षपदासाठी सहा तर सतरा नगरसेवक पदांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी प्रेमानंद साळगावकर (शिवसेना), संदीप कुडतरकर (काँग्रेस), मनोज नाईक (भाजप) या राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा लावली आहे. अॅड. बापू गव्हाणकर, प्रसाद पावसकर व यशवंत पेडणेकर यांनी अपक्ष राहून लढत दिली आहे. सावंतवाडी नगरपरिषद, निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली असून, पालकमंत्री दीपक केसरकर या निवडणुकीचे टार्गेट आहेत. नारायण राणे यांनी नोटाबंदीमुळे भाजपने देशात बेबंदशाही आणल्याचे म्हटले आहे. सावंतवाडीत शिवसेना, काँग्रेस व भाजप अशी तिरंगी लढत होत असताना शिवसेना राज्यमंत्री केसरकर, खासदार विनायक राऊत सेनाच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.