मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न विरोधकांनी उचलून धरत टीका केली होती. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. करोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला, इतर मंत्री फिल्डवर होते, आमच्याशी चर्चा झाल्याप्रमाणेच मुख्यमंत्री जबाबदारीनं काम करत आहेत, असे पवार म्हणाले. तुळजापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री घरातच असतात अशी टीका विरोधकाकडून सतत केली जातेय? यावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ज्यावेळी अशा प्रकारचं मोठं संकट येतं तेव्हा महत्त्वाच्या व्यक्तिंनी मुंबईत एका ठिकाणी बसून नियोजन करणं आवश्यक असतं. प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून काय उपाय योजना करावी लागेल याचा आढावा घ्यायला लागतो. आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या टिकेचा समाचार शरद पवारांनी घेतला व मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

आणखी वाचा- एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही

“अतिवृष्टीमुळं ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिक घेतलं व ते गोळा केलं परंतु ते सगळं वाहून गेलं. अतिवृष्टीमुळं जमिनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार. हा प्रश्न खूप मोठा आहे नी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा” असे शरद पवार म्हणाले.

आणखी वाचा- कृषी विधेयकाला शेतकऱ्यांचा विरोध का? – शरद पवार सांगतात

उद्धव ठाकरेंचा आज सोलापूर दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते आज, १९ ऑक्टोबर रोजी सोलापुरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.  तर उद्या त्यांचा मराठवाडा दौरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.