छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम कुशल प्रशासक (मॅनेजमेंट गुरु) अशी ओळख सांगणारा शिवाजी महाराजांवरील धडा पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जाईल. हा धडा आठ पानांचा असेल. शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम सर्वांना माहिती आहे. परंतु, शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते, याची ओळखही विद्यार्थ्यांना या धड्यातून होईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर विनोद तावडे म्हणाले, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम चौथीच्या पुस्तकात शिकविला जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवाजी महाराज यांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष व्यवस्था होती. पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम शिवाजी महाराजांनी आपल्या काळात राबविला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात महाराजांनी राबविली. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरु) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्देशाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल.