करोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील ११६ जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी २० जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील ११६ जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. ११६ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान २५ हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ २९ लाख मजुरांना होणार असून पुढील ४ महिने (१२५ दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

काय काम मिळणार?

‘गरीब कल्याण योजना’ या योजनेअंतर्गत कामगारांना २५ प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

कोणत्या राज्यातील किती जिल्हे ?-
गरीब कल्याण रोजगार योजने अंतर्गत राजस्थानमधील २२, मध्यप्रदेशातील २४ उत्तरप्रदेशातील ३१ बिहारमधील ३२ तर ओडिशातील ४ आणि झारखंडमधील तीन जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबविण्यात येणार आहे.

स्थलांतराची महाराष्ट्रातून संख्या जास्त –
देशातील विविध भागातून आपल्या गावी गेलेल्या स्थलांतरीत मजुरापैकी मोठी संख्या ही महाराष्ट्रातील आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी गेले आहेत. या भागात बहुतांशी मजूर हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या भागातील होते.