राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासहीत गावातील १९ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या काही दिवसांनंतर लगेच गावामधील करोना बाधितांची संख्या वाढल्याचं चित्र दिसून आल्याने राठोडच सुपर स्प्रेडर ठरले नाहीत ना अशी चर्चा सुरु झालीय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर १५ दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे जनतेसमोर येत मोठे शक्तिप्रदर्शन केले. पश्चिम विदर्भात कोविड संसर्गाचा उद्रेक होत असतांना वनमंत्र्यांनी बेजबाबदारपणे केलेले शक्तिप्रदर्शन करोना वाढीला हातभार लावणारे ठरल्याचे चित्र दिसत आहे. या शक्तीप्रदर्शनानंतर वाशीम जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला. पोहरादेवी येथे सुद्धा महंतांच्या कुटुंबासह १९ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही; भाजपा आक्रमक "मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?"#SanjayRathore #PoojaChavanCase @BhatkhalkarA #BJP #Maharashtra — LoksattaLive (@LoksattaLive) February 26, 2021 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस ते संपर्कात नव्हते. जनतेसमोर येऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी गड या पवित्र स्थानाची निवड केली. सुमारे चार दिवस अगोदरपासून त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. समाज माध्यमातील विविध समूहांमध्ये विशिष्ट संदेश फिरून संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. या ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करून दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न होता. संजय राठोड यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा होती. २३ फेब्रुवारीला सकाळी संजय राठोड दारव्हा येथून पोहरादेवी येथे दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांची रीघ लागली. विशेष म्हणजे वाशीम जिल्हय़ात जमावबंदीचे आदेश लागू होते. तरीही १० ते १२ हजार समर्थकांनी पोहरादेवी येथे एकच गर्दी केली. विविध ठिकाणावरून हे समर्थक त्या ठिकाणी आले होते. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनाही सौम्य लाठीमार करावा लागला. #WATCH | Crowd gathers as Maharashtra Minister Sanjay Rathod's convoy reaches Pohradevi temple in Washim district; police baton-charge to disperse them. #COVID19 pic.twitter.com/Mh479pV6Fh — ANI (@ANI) February 23, 2021 सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र चित्र होते. हे सर्व करताना करोना संसर्ग वाढीच्या भीषण परिस्थितीचा कुठेही विचार करण्यात आला नाही. करोना आपत्तीत समर्थनाच्या नावावर समाजाच्या हजारो लोकांना एकत्र करत त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार सर्रासपणे घडला. या गर्दीमुळे करोना संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती आता खरी होत असल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांत जिल्हय़ात करोना रुग्ण वाढीचा आकडा चांगलाच फुगला. बुधवारी ३१८ रुग्ण आढळले असून गुरुवारीही दोनशेपेक्षा अधिक करोनाबाधितांची भर पडली. पोहरादेवी येथील महंत कबीरदास यांच्यासहीत गावातील १९ जण जणांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. संजय राठोड पोहरादेवी येथे आले असतांना ते महंत दिवसभर त्यांच्या सोबत होते. गावातील इतरही काही जणांना बाधा झाली. अनेकांना करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात येत आहे. करोना संसर्ग अधिक पसरण्यासाठी वनमंत्र्यांचे शक्तिप्रदर्शन कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नये व कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे जाहीर आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. या प्रकरणी जोरदार टीका झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. वाशीम पोलिसांनी १० जणांसह या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८ ते १० हजार लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मंत्र्यांचा समावेश नाही.