धवल कुलकर्णी

चिकन खाल्ल्यामुळे करोना होतो अशा खोडसाळ अफवांमुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला सध्याच्या टाळेबंदीमुळे अजून मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या अफवेमुळे ग्राहकांची चिकनसाठी असलेली मागणी उतरली आणि नंतर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सुद्धा व्यावसायिकांना चिकन उत्पादन कमी करावे लागले. सध्या या अफवा शांत झाल्या आहेत. तसंच चिकनची मागणीही वाढू लागली आहे. तरीही मागणी आणि पुरवठा यांचा मेळ नसल्याने चिकनचे दर बऱ्यापैकी वाढले आहेत.

एकीकडे चिकन महाग झाले आहे तर दुसरीकडे पोल्ट्री उद्योगाला या सगळ्या कारणांमुळे घरघर लागली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 5.06 कोटी कोंबड्या या संघटित क्षेत्रांमध्ये असल्या तरीसुद्धा नुकत्याच झालेल्या पशू जनगणनेमध्ये शेतकऱ्यांनी परसात वाढवलेल्या कोंबड्यांची संख्या हे लक्षणीय म्हणजेच 2.21 कोटी होती. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला बसलेल्या या फटक्यामुळे कुक्कुटपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहणाऱ्या शेतकऱ्यावर सुद्धा संक्रांत येत आहे, अशी कबुली राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यातले अधिकारी देतात.

एरवी १४० ते १६० रुपये किलोच्या दरम्यान विकलं जाणार चिकन आज साधारणपणे २०० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त भावाने विकलं जातं आहे. त्याचसोबत चिकन पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यामुळे खवय्यांनी मटणाचा पर्याय निवडू लागले आहेत. त्यामुळे मटणाचे भाव सुद्धा किलो मागे सरासरी  पाचशे रुपये किलोवरुन थेट सातशे रुपये किलो आणि त्यापुढे गेले आहेत.

पोल्ट्री क्षेत्रातील उच्चपदस्थांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन पन्नास टक्क्यांहून अधिक घटले आहे. एरवी दिवसाला साधारणपणे तीन हजार मेट्रिक टन चिकनचे उत्पादन होते. मात्र या कालावधीमध्ये त्यामध्ये लक्षणीय घट होऊन साधारणपणे बाराशे ते पंधराशे मॅट्रिक टन च्या दरम्यान ते स्थिरावले आहे. तीच गोष्ट अंड्यांची. एरव्ही दिवसाला साधारणपणे दीड कोटीच्या आसपास असणारे अंड्यांचे उत्पादन फक्त ८० लाखाच्या आसपास आले आहे.

“लॉकडाउनचा कुक्कुटपालन उद्योगावर प्रचंड परिणाम झाला आहे. व्यावसायिकांकडे स्टॉक अत्यंत मर्यादित असून किरकोळ विक्रीची दुकाने कमी वेळासाठी उघडी असल्यामुळे चिकन विकणे अवघड होत आहे. त्याच वेळेला ग्राहकांची मागणी वाढत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चिकनच्या किंमती वाढल्या आहेत,” अशी माहिती एका अग्रगण्य पोल्ट्री क्षेत्रातल्या कंपनी मधल्या उच्चपदस्थ आने दिली.

या अधिकाऱ्याच्या मते पोल्ट्री उद्योगाला चिकनबाबत अफवा सुरु झाल्या तेव्हापासून (४ फेब्रुवारी) ते आजतागायत भारतभरात साधारणपणे  २२ हजार कोटी ते २५ हजार कोटींच्या दरम्यान फटका बसला आहे. फक्त महाराष्ट्र मध्येच हा नुकसानाचा आकडा साधारणपणे २ हजार ५००  कोटी ते ३ हजार कोटींच्या घरात आहे.

भारतामध्ये पोल्ट्री उद्योग दरवर्षी साधारणपणे १ लाख २० हजार कोटीची उलाढाल करतो ज्यापैकी साधारणपणे दहा टक्के म्हणजेच बारा हजार कोटीची उलाढाल महाराष्ट्रामध्ये होते. हे अधिकारी म्हणाले की पोल्ट्री उद्योगाला पुन्हा अच्छे दिन यावेत यासाठी सरकारने पुढाकार घेऊन बँकांना अशा सूचना द्याव्यात ही त्यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना वर्किंग कॅपिटल उपलब्ध करून द्यावे व दिलेल्या कर्जाचे दीर्घकाळासाठी पुनर्घटन करावे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी साधारणपणे एका पक्ष्य्या मागे  शंभर रुपये याप्रमाणे व्यावसायिकांना अनुदान सुद्धा देण्यात यावे.

याबाबत बोलताना शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ही चिकन मुळे करोना होतो अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओ बनवणाऱ्यांविरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर काही जणांवर कारवाई सुद्धा झाली. या भीतीमुळे चिकनची मागणी कमी झाली होती आणि आणि त्याच मुळे काही कंपन्या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा कोंबड्यांची पैदास करायचे प्रमाण कमी केले. अनेक हॉटेल्सना कमी वजनाची कोंबडी लागते आणि सध्या हॉटेल व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे त्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे.